वसमत : तालुक्यातील शेतरस्ते, पाणंद मार्ग आणि गाव नकाशांवर नोंद असलेल्या सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणाविरुद्ध आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तहसीलदार शारदा दळवी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काचे रस्ते मोकळे व्हावेत आणि शेतीसाठी आवश्यक ये-जा सुरळीत राहावी, यासाठी प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. तहसीलदार शारदा दळवी यांनी अतिक्रमण सहन केले जाणार नाही, असा इशारा देत संबंधितांना प्रथम नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगितले.
दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास प्रशासन स्वतः कारवाई करणार असून, या कारवाईचा खर्चही संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. दरम्यान, अनेक गावांमधून या निर्णयाचे स्वागत होत असून, रस्ते मोकळे राहणे ही काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.
वैयक्तिक वाद बाजूला ठेवून सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असे प्रशासनाने स्पष्ट केले. या मोहिमेमुळे वसमत तालुक्यातील शेत रस्त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महसूल नियमांनुसार शेतरस्ते अडवणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांवर केवळ हटविण्याची कारवाईच नाही तर पुढील शासकीय सुविधा आणि योजनांपासूनही वंचित ठेवण्याची कार्यवाही करण्यात येईल असल्याची प्रतिक्रिया शारदा दळवी पाटील यांनी दिली.