कळमनुरी : येथील नवनाथ बेद्रे खून प्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल पाच तासाच्या नाकाबंदी नंतर गुरुवारी पहाटे पाच वाजता हिंगोली ते वाशिम मार्गावर तोंडगाव शिवारातून एका खाजगी वाहनातून पकडले. त्यांच्याकडून आता खुनाचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
येथील नवनाथ बेद्रे या तरुणाचा 22 मे रोजी रात्रीच्या सुमारास खून झाला होता. आरोपींनी नवनाथ याच्या डोक्यात दगडाने वार करून खून केला. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पथके स्थापन करून चौघांना अटक केली होती. मात्र दोघे जण फरार झाले होते.
दरम्यान, या प्रकरणात फरार असलेल्या आकाश सातव, भरत यादव (रा. कळमनुरी) यांचा शोध सुरू करण्यात आला होता. त्यासाठी पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मिना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन केले होते.
दरम्यान, दोघेही राजस्थान भागात पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी राजस्थानला जाण्याची तयारी सुरू केली होती. मात्र बुधवारी ते दोघे वाशिमकडे येणार असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. पोलिसांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री बारा वाजल्या पासून हिंगोली ते वाशिम मार्गावर थांबून वाहनांची तपासणी सुरू केली होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आकाश व भरत एका खासगी वाहनातून जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पुढील चौकशीसाठी कळमनुरी पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार गजानन पोकळे, सतीश जाधव, शिवाजी जालमिरे, हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने केली.