The census will be conducted through a digital mobile app.
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा मागील १६ वर्षांपासून रखडलेल्या २०२७च्या जनगणनेला सुरुवात होणार असून, त्यासाठी अधिकाऱ्यांच्या तीनदिवसीय प्रशिक्षणाला गुरुवार (दि.२६) पासून सुरुवात झाली. ही जनगणना आता डिजिटल पद्धतीने म्हणजेच मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी सांगितले.
येथील जिल्हा नियोजन सभागृहात गुरुवारी तीनदिवसीय म्हणजेच २६ ते २८ या कालावधीत सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच यावेळेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी गृहमंत्रालयाचे सहायक निर्देशकचे प्रशिक्षक सुनील अतराम, संजय नाईक, जी. प्रसाद, नायब तहसीलदार माने आदींची उपस्थिती होती.
यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदींची प्रशिक्षणाला उपस्थिती होती. पुढे प्रस्तावनेत बोलताना बोधवड म्हणाले की, २०२१ मध्ये जनगणना होणार होती, मात्र कोविड संकट आल्याने जनगणनेचे काम पुढे ढकलण्यात आले.
आता १६ वर्षांनंतर म्हणजेच २६-२७ मध्ये ते पूर्ण केले जाणार आहे. आता पूर्वीच्या पद्धतीला फाटा देत यात जनगनणेत अमूलाग्र बदल करण्यात आला आहे. तंत्रज्ञान, माहिती युग असल्याने आपण प्रशासकीय कामकाजात उपक्रम, योजना राबवतो त्याचप्रमाणे आता पोर्टलवर प्रगणाकडून माहिती भरली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात काय जबाबदाऱ्या असतील त्या चार्ज ऑफिसर, ऑपरेटर यांनी येणाऱ्या काळात पूर्ण करतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रधान जन-गणना अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी सांगितले.