हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: सध्या जिल्हाभरात पेरणीची लगबग सुरू आहे. एकीकडे पेरणीची लगबग सुरू असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांचे संपर्क दौरेही गावोगावी सुरू आहेत. वसमतचे आमदार राजू पाटील नवघरे हे आपल्या संपर्क अभियानाच्या निमित्ताने सतीपांगरा येथे जात असताना एका शेतात सोयाबीनची पेरणी सुरू होती. त्यांनी थेट शेतात जाऊन तिफन हाकली. जवळपास सात ते आठ मुलडन त्यांनी सोयाबीनची पेरणी करून आपल्यातील शेतकरी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले.
आमदार राजू पाटील नवघरे यांचा सतीपांगरा येथे दौरा
यावेळी त्यांनी थेट शेतात जाऊन तिफन हाकली
आपल्यातील शेतकरी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले.
सध्या आमदार राजू पाटील नवघरे हे मतदार संघातील गावांना भेटी देत येथील ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेत आहेत. काही ठिकाणी विकास कामांचे भुमिपूजन तर काही ठिकाणी कामांचे उद्घाटन करीत आहेत. सोमवारी त्यांच्या पूर्वनियोजीत दौर्यानुसार ते सतीपांगरा येथे जात असताना त्यांना अभिनव शिंदे यांच्या शेतात बैलजोडीच्या सहाय्याने तिफनीद्वारे सोयाबीनची पेरणी सुरू असल्याचे दिसले. त्यांनी लगेच आपली गाडी थांबवून शेतात जाऊन शिंदे यांना मला सोयाबीनचे काही मुलडन पेरू द्या, अशी विनंती केल्यानंतर शिंदे यांनी तिफनीचा कासरा त्यांच्या हातात दिला.
आ. नवघरे यांनी जवळपास सात ते आठ मुलडन पेरणी केली. यावेळी त्यांनी शिंदे यांना कोणत्या वाणाचे सोयाबीन पेरत आहात, बीजप्रक्रिया केली किंवा नाही, एकरी किती बियाणे पेरत आहात, तणनियंत्रणासाठी काय उपाययोजना करणार आदींची विचारपूस करीत त्यांना खरीप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. नवघरे हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी शेतीमध्ये सर्व मशागतीची कामे केल्याने त्यांना आजही शेतीविषयी आस्था असल्याचे दिसून आले.