हिंगोली : केंद्र आणि राज्य सरकारने जनतेला अच्छे दिनचे खोटे स्वप्न दाखवून महागाईच्या खाईत लोटले आहे, असा घणाघात करत येथील महात्मा गांधी चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई, शेतकरी युवकांचे प्रलंबित प्रश्न, आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराविरोधात चक्क रस्त्यावर स्वयंपाक करत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी काळात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवून जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात यावीत, गॅसचे दर तातडीने कमी करावेत, शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा. तसेच नाफेड अंतर्गत खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे न देता फरार झालेल्या संस्था चालकांवर कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावेत, जलजीवन योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, जिल्ह्यातील खरवी बंधारा प्रकल्प रद्द करण्यात यावा, हिंगोली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ मार्ग रद्द करण्यात यावा. शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी करण्यात आली.
या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच रस्त्यावर स्वयंपाक करून महागाईच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, जिल्हा प्रमुख अजय सावंत, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, वसीम देशमुख, सुनील काळे, दिलीप घुगे, माऊली झटे, आनंदराव जगताप, अनिल शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यासह देशभरात नागरिकांना केंद्र व राज्य सरकारने अच्छे दिन चे स्वप्न दाखवले. मात्र महागाई दिवसेंदिवस वाढत चालली असून सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. बेरोजगारीचा प्रश्न ही गंभीर आहे. शेतकरी देखील अडचणीत सापडले आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सरकारला देणे-घेणे ठरले नाही त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारला धडा शिकवला पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे असे आवाहन जिल्हाप्रमुख गोपू पाटील सावंत यांनी केले.