MP Nagesh Ashtikar: Left the Ubatha group as development work was not being done
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडखोरीच्या नाट्यानंतर अखेर बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चावर पडदा टाकताना त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. आपण शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विचारधारा कुठेही सोडलेली नाही. सत्तेत असल्याशिवाय कामे होत नव्हती, म्हणूनच मी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकांनी मला ज्या आशेने खासदार म्हणून निवडून दिले, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण पाऊल उचलले आहे. सत्तेत असल्याशिवाय लोकांचीही कामे होत नव्हती. अनेकांना माझी भूमिका पटली नसेल, काहींना पटलीही असेल. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, मला तुमच्याकडे सालाने ठेवा, मी तुमचे साल नेकीने करेन. माझ्यावर तुम्ही जी जबाबदारी ठेवलीय, ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडेल, असे आष्टीकर यांनी नमूद केले. सर्वांना माहिती आहे की, कोणत्याही प्रकारचा निधी आपल्याला मिळत नाही. जे 5 कोटी मिळतात, ते अतिशय अपुरे आहेत.
प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा आहेत. प्रत्येकाने मला काही ना काही आशेने निवडून दिले. मी ही कामे कशी करायची आणि निधी कोठून मिळवायचा ? लोकांची जी कोणती कामे आहेत, ती होत नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राग व्यक्त करा, पण असंवैधानिकपणे बोलू नका. शब्द मनाला खूप लागतात. कारण आपल्याच गावच्या बाभळी आणि आपल्याच गावच्या बोरी, असे म्हणत मी कार्यकर्त्यांसोबत कायम असेल, असेही आष्टीकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, परभणीचे खा. संजय जाधव यांनी यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली होती. त्यापाठोपाठ आष्टीकर आणि ओमराजे यांनी आपले म्हणणे जाहीर केले आहे. त्यामुळे आता फक्त सहा जणांचा गट शिंदे सेनेत अधिकृतरित्या विलीन करणेच बाकी आहे. याबाबतची घोषणा सोमवारी अथवा मंगळवारी होईल, असे अधिकृत रित्या कळते. सहा पैकी आता कोणत्याही खासदाराचा निर्णय बदलला जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
१८ तारखेपर्यंत तर उबाठातच होतो...
उद्धव ठाकरे यांच्यावर अजिबात नाराज नाही. त्यांनी मला खूप प्रेम दिले. संजय राऊत वगैरे कोणी ही मोठी मंडळी बोलत असेल तर तो त्यांचा हक्क आहे, त्यांनीही माझ्यावर प्रेम केले आहे, ते बोलतील, ते काही अडचणीचे नाही. माझ्या वडिलांप्रमाणे ते आहेत, ते बोलले तरीही मला त्याच्यावर वाईट वाटणार नाही, पण हे सर्व करत असताना आम्ही 18 तारखेपर्यंत तरी कोणी कुठेच गेलो नव्हतो. पण ज्यापद्धतीचा अविश्वास किंवा बोलण्याचा अतिरेक झाला, त्यानतंर बऱ्याच मंडळींनी विचार केला की, आता तिथे थांबून फार उपयोग होणार नाही. राऊत साहेब म्हणाले की, झोडून काढा, मात्र झोडून काढू म्हटले तरी कोणीही कोणाला कमी नसते, मात्र त्याचे परिणाम वाईट होतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.