वसमत : हिंगोली जिल्ह्यासह वसमत तालुक्यात आज मध्यरात्रीनंतर भूकंपाच्या सलग धक्क्यांनी नागरिकांची झोप उडवली. मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटांनी सर्वात मोठा भूकंपाचा धक्का जाणवला असून त्याची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अवघ्या काही तासांत आणखी पाच लहान-मोठे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिला 4.4 रिस्टरस्केलचा धक्का 1.37 वाजता जाणवला. त्यानंतर 2.15 वाजता दुसरा, 2.17 वाजता तिसरा, 2.25 वाजता पुन्हा जोरदार धक्का, तसेच पहाटे 3.23 वाजता आणखी एक 4.1 रिस्टरस्केलचा धक्का जाणवला. अशाप्रकारे दोन ते तीन तासांच्या कालावधीत सहा वेळा भूकंपाचे धक्के बसल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडले.
या भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील शिरळी परिसरात असल्याची माहिती भुगर्भ विभागाच्या माहिती स्थळावरून मिळत आहे. रात्रीच्या शांततेत अचानक घरांचे दरवाजे, खिडक्या, पंखे आणि घरातील वस्तू हलल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली अनेकांनी तातडीने घराबाहेर धाव घेत मोकळ्या जागेत आश्रय घेतला वसमत शहरासह काही गावांमध्ये नागरिकांची रात्रभर जागरण सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
सुदैवाने वृत्त लिहीपर्यंत कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या मालमत्तेच्या नुकसानीची नोंद झालेली नव्हती. मात्र प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे. उपविभागीय अधिकारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आणखी धक्के जाणवल्यास तात्काळ सुरक्षित मोकळ्या जागेत जाण्याचा सल्ला दिला आहे.