हिंगोली : जिल्ह्यात गुरूवारी पहाटे 1.37 मिनीटांनी भुकंपाचे धक्क जाणवले. रिश्टर स्केलवर या भुकंपाची तीव्रता 4.6 इतकी नोंदविण्यात आली. हिंगोलीतील सिरळी परिसर पहिल्या धक्क्याचे केंद्रबिंदु होते. त्यानंतर सलग चार भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. एकामागे एक धक्के बसत राहिल्याने नागरीकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. जिल्ह्यातील जवळपास 40 गावांमध्ये धक्का जाणवला. काही गावात भिंतींना तडे गेल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी पहाटे 1 वाजून 37 मिनिटांनी 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून वसमत तालुक्यातील सिरळी हे भूकंपाचे केंद्रबिंदू असून खोली 10 किलोमिटर आहे. त्यानंतर दुसरा धक्का 2.15 मिनिटांनी 3.6 रिश्टर स्केल, 2 वाजून 17 मिनिटांनी 3.9 रिश्टर स्केल, तर 3 वाजून 23 मिनिटांनी 4.1 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली असूनत त्याचे केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील काकडदाभा असल्याचे स्पष्ट झाले.
या भूकंपाचे धक्के वसमत, हिंगोली, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात अधिक तिव्रतेने जाणवले. ग्रामीण भागातील गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. आमदरी येथे एका घराची भिंत कोसळली असून 10 ते 12 घरांना तडे गेले आहेत. तसेच पांगरा शिंदे गावात 50 ते 60 घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यास प्रशासन सज्ज असून स्थानिक यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊन नये आपत्कालीन परिस्थिती किंवा नुकसान आढळल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांनीही समाजात भितीचे वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश समाज माध्यमातून पोस्ट करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गुरूवारी सकाळी शिंदे पांगरा व खापरखेडा येथे नागरीकांशी संवाद साधून दिलासा दिला.