हिंगोली : कयाधू नदी खरबी येथे बंधारा बांधून पाणी भूमिगत बोगद्याद्वारे इसापूर धरणात सोडण्यात येणार असल्याने जिल्ह्याचे वाळवंट होणार आहे. हा बंधारा तत्काळ रद्द करून कयाधूचे पाणी इसापूर धरणात वळवू नये या मागणीसाठी मंगळवारी शेकडो शेतकऱ्यांनी खांबाळा येथे बोगदास्थळी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्ह्याची वरददायिनी म्हणून ओळख असलेल्या कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात वळविण्याचे काम सध्या सुरू आहे. खरबी येथे बंधारा बांधून नदीचे संपूर्ण पात्र भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून इसापूर धरणात वळविले जात आहे. बोगद्यामुळे त्या परिसरातील विहीर, बोअर आटणार आहेत. तसेच कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात वळवून ते थेट नांदेडला नेले जाणार आहे. परिणामी, सेनगाव, हिंगोली, कळमनुरी तालुक्यातील नदीच्या काठी असलेला परिसराचे वाळवंट होणार असल्याने या कामाला जिल्हाभरातून मोठा विरोध होत आहे.
सरकारने शेतकऱ्यांचा विरोध डावलून भूमिगत बोगद्याचे काम सुरू केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. डॉ. रमेश शिंदे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी मंगळवारपासून थेट कामाच्या ठिकाणीच धरणे आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन साखळी पद्धतीने होणार आहे.
जोपर्यंत हे काम रद्द केले जाणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी आक्रमक भूमिका त्या परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी दिवसभर तळ ठोकून होते.
तर परिस्थिती गंभीर होणार
कयाधू नदीचे पाणी बोगद्याच्या माध्यमातून इसापूर धरणात वळविल्यास खरबी बंधाऱ्याखालील भागात असलेल्या गावाचे वाळवंट होणार आहे. कयाधू नदी काठावर शेकडो गावे आहेत. या नदीच्या पात्रातून अनेक गावांना पाणीपुरवठा योजनेसाठी विहिरी बांधून पाणीपुरवठा होतो. पाणी वळविल्याने कयाधू नदीच्या खालील गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे हा बंधारा रद्द करणे गरजेचे बनले आहे.