वसमत : तालुक्यातील मौजे कागबन येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी धावणारी स्कूल बस थोरावा-कागबन-सारोळा जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील चिखलात रुतल्याची घटना घडली. रस्त्याची चाळण झाल्याने बसमधील चिमुरड्या विद्यार्थ्यांनाच बसला धक्का मारून ती चिखलातून बाहेर काढावी लागली.
या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. खराब रस्त्यामुळे शाळकरी मुलांसह शेतकरी, कर्मचारी, व्यावसायिक आणि नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व उदासीनता व्यक्त होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.