Illegal slaughter of teak in the name of Randha machine
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात रंधा मशीनच्या नावाखाली सागवानाच्या झाडांची अवैधरीत्या कत्तल केली जात असून दुसरीकडे वन विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जंगल नावालाच शिल्लक राहात असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. वन विभागाची डोळेझाक नागरिकांच्या चर्चेचा विषय बनली आहेत.
जिल्ह्यात कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जंगलाचा भाग आहे. या ठिकाणी सागवानासह इतर झाडे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. मात्र मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातून रंधामशीन सुरू झाल्या आहेत. जंगलाच्या भागातच ग्रामीण भागाला लागूनच रंधा मशीन सुरू करून सागवान तस्करांनी डोके वर काढले आहे. हिंगोली जिल्ह्यातील जंगलाचा भाग असलेल्या परिसरातील सागवानाची सर्रास कत्तल करून माळरान बोडखे केले जात आहेत.
रात्रीच्या वेळी सागवानाच्या झाडांची कत्तल करून त्याची रातोरात वाहतूक केली जात आहे. त्यानंतर रंधा मशीनवर त्यांची कटाई करून सागवानाची विल्हेवाट लावली जात आहे. या सर्व प्रकाराकडे वन विभागाकडून सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. जिल्ह्यातील सागवान तस्करावर अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकाराची कारवाई केली जात नसल्याने त्यांना वन विभागाचे पाठबळ असल्याचा आरोपही केला जाऊ लागला आहे.
हिंगोली जिल्ह्यात वन विभागाकडून एकीकडे वृक्षलागवडीचा फार्स केला जात असून दुसरीकडे अवैध वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पुढील काळात जिल्हयातील जंगल नामशेष होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. कळमनुरी तालुक्यातील जांब, निमटोक, बोथी, पावनमारी, उमरदरा, डोंगरकडा या भागात सुरू असलेल्या रंधामशीनच्या नावाखाली झाडांची अवैध कत्तल सुरू असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.