हिंगोली : शहरात मुख्य बाजारपेठेत मोकाट जनावरांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळांत मोकाट जनावरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. मोकाट जनावरे मुख्य रस्त्याच्या मधोमधच बसत असल्याने जनावरे स्पीडब्रेकर ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारपेठेतील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहतुकीची कोंडी होत आहे.
शहरातील बस स्थानक, गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, आणि मुख्य बाजारपेठ यांसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. ही जनावरे थेट रस्त्याच्या मध्यभागी बसत असल्याने रोजच वाहतूक कोंडी होत आहे. अनेकदा ही जनावरे अचानक आपापसांत भिडत असल्याने पादचाऱ्यांची आणि वाहनधारकांची मोठी धावपळ उडत असल्याचे चित्र आहे.
रात्रीच्या वेळी रस्त्यावर प्रकाश कमी असल्यास किंवा अंधारात रस्त्यावर बसलेली जनावरे चालकांना दिसत नाहीत, त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने धडकून गंभीर अपघात होत आहेत. अचानक रस्त्यात येणाऱ्या जनावरांमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या आणि गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
मुख्य बाजारपेठेत जनावरांच्या ठिय्यामुळे अस्वच्छता पसरत असून ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणे अवघड बनले आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
मोकाट जनावरांच्या मालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि शहरात विशेष मोहीम राबवून या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. मोठा अपघात घडून कोणाचा नाहक बळी जाण्यापूर्वी प्रशासन यावर काय पावले उचलणार, याकडे सर्व हिंगोलीकरांचे लक्ष लागले आहे.