हिंगोली : पोलिस दलाच्या वतीने तातडीच्या मदतीसाठी सुरू केलेल्या डायल ११२ या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलाने जुलै महिन्यात १०२९ जणांना मदत करून राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे.
राज्यात पोलिस दलाच्या वतीने २०२१ पासून सुरू असलेल्या डायल ११२ प्रणालीद्वारे नागरिकांना तातडीची पोलीस मदत उपलब्ध करून दिली जाते. हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये ही सेवा प्रभावीपणे कार्यरत असून पोलिस नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे प्रतिसादाचा वेग आणि कार्यक्षमता लक्षणीय वाढली आहे.
डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर शक्य तितक्या लवकरच पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करीत आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदत मिळणे शक्य झाले आहे.
आतापर्यंत डायल ११२ वर आलेल्या हजारो कॉल्सपैकी महिलांशी संबंधित, अपघात, चोरी, हरवलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आपत्कालीन घटनांमध्ये पोलिसांनी तातडीने मदत पुरवली. गरजू नागरिकांना वेळेत मदत मिळाल्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला.
दरम्यान, घटनास्थळी तातडीने पोहोचून कारवाई करण्याच्या कामगिरीतही हिंगोली जिल्ह्याने जून महिन्यात राज्यभरात २८ वा क्रमांक मिळविला होता. मात्र त्यानंतर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र कक्ष सुरू करून त्याचा नियमितपणे आढावा घेण्यास सुरुवात केली होती.
यामध्ये एखाद्या घटनेची पोलिस ठाण्याला कधी माहिती मिळाली, पोलिस यंत्रणा घटनास्थळी कधी पोहोचली, पोलिसांना पोहोचण्यासाठी उशीर का झाला याची माहिती घेऊन जिल्हा पोलिस दल कुठे मागे पडत आहे याची माहिती देत त्याचे नियोजन करून दिले. त्याचा सकारात्मक परिणाम जुलै महिन्यात झाला असून जून महिन्यापर्यंत २८ व्या क्रमांकावर असलेल्या हिंगोली जिल्ह्याने थेट राज्यात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्यात जिल्हा पोलिस दलाच्या ११२ वर १०२९ कॉल्स प्राप्त झाले. त्यापैकी ३०८ महिलांना वेळेत मदत करण्यात आली. अपघाताच्या २९ घटनांमध्ये जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात यश आले. तसेच चोरीचे ५४, रोड अपघाताचे २९, बेपत्ता झाल्याच्या ६, ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित ५२ आणि इतर ३३४ प्रकरणांमध्ये त्वरित पोलिसांची मदत पुरविण्यात आली आहे.