Hingoli police action sand mafia
हिंगोली : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असतानाही महसूल व पोलीस प्रशासनाकडून याबाबत सातत्याने नकार दिला जात होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारवाईदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाची चांगलीच नाचक्की होत असल्याची चर्चा सुरू आहे.
गुरुवारी रात्री सेनगाव तालुक्यातील गोरेगाव चौफुली परिसरात उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला. या कारवाईदरम्यान टिप्पर चालक समाधान राऊत तसेच जीपमधून आलेल्या संजय गोरे यांनी घटनास्थळी गोंधळ घातल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संजय गोरे हा “गोरेगाव परिसरात दररोज शंभरहून अधिक वाहनांतून वाळूची वाहतूक होते, मग माझ्याच वाहनावर कारवाई का?” असा सवाल उपस्थित करताना दिसत आहे. “मी हप्ता दिला नाही म्हणून कारवाई केली का?” असा आरोपही त्याने केला. तसेच “मला मारल्याशिवाय मी गाडीत बसणार नाही,” असे म्हणत त्याने पोलिसांना बराच वेळ झुंजवले.
विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित व्यक्तीस “अध्यक्ष, तुम्ही गाडीत बसा,” अशी विनवणी केल्याचेही व्हिडिओत दिसून येत आहे. त्यामुळे वाळू माफियांबाबत पोलीस प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर “वाळू माफियांमध्ये एवढी मुजोरी येते कुणाच्या आशीर्वादामुळे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच पोलीस प्रशासनाला संबंधितांसमोर नरमाईची भूमिका का घ्यावी लागत आहे, यावरही चर्चा रंगली आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संगनमतामुळेच वाळू माफियांना मोकळे रान मिळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात समाधान राऊत आणि संजय गोरे यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा असून हट्टा, औंढा नागनाथ आणि सेनगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे प्रकार सर्रास सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या अवैध व्यवसायाकडे महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
वाळू तस्करीतून मोठे अर्थकारण निर्माण झाले असून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे “खिसे गरम” होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. जिल्ह्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक असतानाही स्थानिक पातळीवर मोठ्या आर्थिक उलाढाली होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.