औंढा नागनाथ : तालुक्यातील मौजे राजापूर शिवारात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्याच्या शेतातील सोलर पॅनेलचे मोठे नुकसान झाले. या घटनेत अनेक पॅनेल उखडून पडले असून काही पॅनेल तुटल्याने शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रभू रामा नांगरे यांनी आपल्या गट क्रमांक 105 मध्ये शेतीसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारला होता. मात्र, गुरुवार रोजी सायंकाळी अचानक वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे पॅनेलची संरचना कोसळली. अनेक पॅनेल जमिनीवर पडून फुटले, तर विद्युत जोडण्यांचेही नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याने शासनाकडे पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. वादळी वाऱ्यामुळे आधीच शेती पिकांचे नुकसान होत असताना आता सौरऊर्जा प्रकल्पालाही फटका बसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शासनाने तातडीने मदत करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.