हिंगोली : पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्ह्यासाठी शनिवार, व रविवारी (दि.१९ व दि. २०) दरम्यान दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Hingoli Heatwave)
या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणी जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून योग्य ती काळजी घ्यावी.
नागरिकांना तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. अपस्मार, हदयरोग, मूत्रपिंड, यकृतविषयक आजारांमुळे ज्यांना शरीरात द्रवपदार्थ टिकवण्याचा प्रश्न येतो. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच द्रवपदार्थ किंवा पाणी प्राशन करावे. ओआरएस म्हणजेच तोंडाने घ्यावयाचे शरीरातले पाणी वाढवणारे द्रवपदार्थ, घरगुती लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळाचे पाणी घ्या. हलक्या रंगाचे वजनाला हलके आणी सौलसर सुती कपडे वापरा. घराबाहेर असाल तर डोके झाका. एखादे कापड वापरा, टोपी पाला किंवा छत्री वापरा. डोळ्यांच्या सुरक्षतेसाठी गॉगल वापरा आणि उन्हापासून कातडीचाही बचाव करायला सनस्क्रीम वापरा. अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक हानी पोहोचेल असे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्तींची विशेष काळली घ्यावी.
नागरिकांनी उन्हात जायचे टाळा, विशेषतः दुपारी १२ ते ३ मध्ये दुपारी बाहेर असताना श्रमाची कामे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. दारे, खिडक्या उघड्या ठेऊन अन्न शिजवण्याचे क्षेत्र स्वयंपाकघर हवेशीर राहील बघा. अल्कोहोल म्हणजे दारु, चहा, कॉफी, शीतपेय टाळा त्यातून शरीरात पाणी कमी होते. उच्च प्रथिनयुक्त मिठाचे प्रमाण जास्त असलेले किंवा तिखट तसेच तेलकट अन्न खाऊ नका. शिळे अन्न खाऊ नका. चारचाकी वाहन लावून ठेवताना त्यात लहान मुले किंवा प्राणी ठेऊ नका. चमकणारे दिवे किंवा बल्ब वापरू नका, त्यातुन अनावश्यक उष्णता निर्माण होते, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.