हिंगोली ः शहरात गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा चटका प्रचंड वाढला असून उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी हिंगोलीत तापमान 40 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचल्याने दुपारच्या वेळी शहरात अक्षरशः शुकशुकाट पहायला मिळाला. कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत असल्याने शहरातील प्रमुख रस्ते ओस पडले आहेत.
नेहमी लोकांच्या गर्दीने गजबजलेले असणारे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपालिका, जिल्हा व सत्र न्यायालय, पोलिस अधीक्षक कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट दिसून आला. शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली असून, या परिसरातील रस्ते आणि परिसर दुपारच्या सुमारास पूर्णपणे शांत झाले आहेत.
वाढत्या उन्हामुळे डांबरी रस्ते तापत असल्याने वाहनधारकांनीही रस्त्यावरून फिरणे टाळले आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हाचा तडाखा सर्वाधिक असतो, त्यामुळे या काळात विनाकारण बाहेर फिरणे टाळावे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केलेे. उष्माघातापासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे, डोक्याला रुमाल बांधणे आणि सूती कपड्यांचा वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ऊन तापण्यास सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असल्याने बाजारपेठेवरही याचा परिणाम मोठा परिणाम होत आहे. काही महत्त्वाचे काम आल्यास नागरिक तोंडाला रूमाल बांधून बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात भीषण उष्णतेचा एक बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोली येथील बसस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर 15 एप्रिल रोजी पहाटे एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. शेख रफिक शेख उस्मान (रा. आनसिंग, ता. वाशिम, ह.मु, जवळा बुद्रुक, ता. हिंगोली) असे मृताचे नाव असून, त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला.