Nanded Cashew Almond Drought Meeting Row
वसमत : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा संतप्त शेतकऱ्यांनी ताफा अडवून भरणे यांना चक्क काजु- बदाम भेट देऊन आपला संताप व्यक्त केला. शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास कृषीमंत्री भरणे यांनी टाकळगाव येथे दुष्काळाने उद्धवस्त झालेल्या पिकांची पाहणी केली. पाहणीदरम्यान, उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवून त्यांना काजु-बदाम दिले. तसेच शेतकऱ्यांनी काजु-बदाम खायेंगे, दुष्काळ दौरा करेंगे अशा घोषणा देत दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या कृषीमंत्री भरणे यांना ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
या दौऱ्यात आमदार राजूभैय्या नवघरे, खासदार रामराव वडकुते यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. वसमत परिसरात यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद तसेच इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पिके पिवळी पडून वाळण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
दरम्यान, कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी नांदेड येथील एका बैठकीत मंत्री महोदयांना काजू-बदाम देण्यात आल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. एका बाजूला दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल असताना दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या चित्रांमुळे संतापाची भावना निर्माण झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी पिकांचे झालेले नुकसान, वाढते कर्ज, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि तातडीने मदतीची आवश्यकता याबाबत कृषी मंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, पीकविमा दावे लवकर मंजूर करावेत तसेच दुष्काळग्रस्त तालुका घोषित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. दौऱ्यानंतर प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचा तपशीलवार आढावा घेण्यास सुरुवात केली असून शेतकरी आता शासनाच्या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत.