गोरेगाव : हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस पेस्टिसाइड व कीटकनाशक औषधांची विक्री होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. अनेक कंपन्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व जिल्हा कृषी प्रशासनाच्या आशीर्वादाने खुलेआम बोगस औषधांची विक्री करत असल्याचा आरोप केला आहे. सं
बंधित कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रतिमेला पैशांचा हार घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात सुमारे ९० टक्के कीटकनाशकांची गुणवत्ता संशयास्पद असून, निकृष्ट व बोगस औषधांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही कृषी विभागाकडून दोषी कंपन्यांवर कोणतीही प्रभावी कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत;
हिंगोली जिल्ह्यात विक्री होणाऱ्या सर्व संशयित कीटकनाशकांची तात्काळ तपासणी करण्यात यावी.
बोगस औषधे विकणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
बोगस औषधांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, शासनाने तातडीने कारवाई न केल्यास जिल्हाभर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व कृषी प्रशासनाची राहील.
या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.