Siddheshwar Dam water dispute
औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील केळी तलावात सिद्धेश्वर तलावातील पाणी उपसा करून सोडावे, या मागणीसाठी गोळेगाव परिसरातील तब्बल २७ गावांतील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन दिले होते. मागणी मान्य न झाल्यास ११ मे रोजी मौजे गोळेगाव येथील कॅनॉलमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला होता.
यानुसार सोमवारी (दि.११) मोठ्या संख्येने शेतकरी गोळेगाव येथील आंदोलनस्थळी एकत्र आले. शेतकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुदूस, दत्ता कानगुले यांच्यासह पोलीस पथकाने परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनादरम्यान शेतकरी कॅनॉलमध्ये उतरले आणि “पाणी सोडा” अशा घोषणा देत हातात फलक घेऊन जलसमाधी आंदोलन सुरू केले. परिस्थिती तणावपूर्ण बनत असताना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात परिसरातील २७ गावांतील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग दिसून आला. अनेक शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे भविष्यात पाणीप्रश्नावरून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.