हिंगोली : औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागातील सुमारे 57.53 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात दोषीवर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून कागदोपत्री खेळ सुरु झाला असून तीन वेळा गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊनही गुन्हे दाखल का होत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणात आता सर्व दोषींवर गुन्हे कधी दाखल होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागात कपातीच्या रकमेमध्ये 57.53 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाच्या चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची शिफारस समितीने केली आहे. या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांसह पाच कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र समितीचा अहवाल प्राप्त होऊन सुमारे 8 महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही जिल्हा परिषदेकडून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे.
या प्रकरणात जिल्हा परिषदेकडून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे यांनी वेळोवेळी आंदोलन केले. मात्र या आंदोलनाच्या वेळी जिल्हा परिषदेने लेखा आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही गुन्हे दाखल झाले नाही. त्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे यांनी शनिवारी स्वातंत्र्यदिनी काळ्या फिती लाऊन निषेध करण्याचा इशारा दिला होता. मात्र जिल्हा परिषदेने कारवाई सुरु असल्याचे पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी 13 ऑगस्ट रोजी गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. अपहार प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यास प्राधिकृत केल्यानंतरही गुन्हे दाखल का केले नाही याचा खुलासा करावा असे नमूद केले.