Aundha Nagnath Farmer Death
औंढा नागनाथ: कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याच्या नैराश्यातून औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील शेतकरी भगवान त्र्यंबकराव मोरे यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची घटना गुरुवारी ( दि. २० ) घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शासन स्तरावर जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने मोरे हे काही दिवसांपासून चिंतेत होते. याच त्रासातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. विषप्राशन केल्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्याने खरोखरच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून टोकाचे पाऊल उचलले की यामागे अन्य काही कारणे आहेत, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.