Kalamnuri youth death
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ऐडशी तांडा (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे वीज दुरुस्ती करताना विजेचा तीव्र धक्का बसून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, राम शिवाजी पवार (वय 24, रा. ऐडशी तांडा) हे बुधवारी (दि. 8) सायंकाळी सुमारे 4.30 वाजता आपल्या शेतात वीज दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 33 के.व्ही. वीज खांबावर चढून काम करत असताना अचानक विजेचा जोरदार शॉक लागला.
या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ऐडशी शिवारातील गट क्रमांक 115 व 116 मध्ये, गावापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर घडल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, लखन शिवाजी पवार (वय 23, रा. ऐडशी तांडा) यांनी याबाबत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.