हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी कापूनही अत्यंत संयम राखत पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने माजी खासदार हेमंत पाटील यांची विधान परिषदेच्या आमदारकीपदी निवड करण्यात आली. मंगळवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पाटील यांना आमदारकीची शपथ दिली. पाटील यांना आमदारकी मिळाल्यामुळे ते पुन्हा एकदा हिंगोली लोकसभा मतदार संघाकडे आपला मोर्चा वळवतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांचे तिकीट कापून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचा पराभव झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. काही दिवसांपूर्वीच पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल करण्यात आला होता. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष असलेल्या पाटील यांना पुढील १२ वर्षापर्यंत कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा राहणार असतानाच मंगळवारी त्यांना पुन्हा विधान परिषदेची लॉटरी लागल्याने एकनाथ शिंदे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाटील यांची विधान परिषदेवर झालेली नेमणूक पक्षांतर्गत विरोधकांसह मित्रपक्ष असलेल्या भाजपतील अनेकांना शह देणारी ठरली आहे. अत्यंत मित्तभाषी व नियोजनात माहीर असलेले हेमंत पाटील हे पुन्हा एकदा जोमाने शिवसेनेच्या संघटन वाढीला वेळ देतील व पक्षासाठी हिंगोली व नांदेडमध्ये महत्त्वाचा चेहरा म्हणून ओळखल्या जातील असे स्पष्ट होऊ लागले आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सर्वेच्या नावाखाली हेमंत पाटील यांच्या उमेदवारीस विरोध केल्यानंतर ऐनवेळी पाटील यांची उमेदवारी कापून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. परंतू कोहळीकर यांचा पराभव झाला. आता हेमंत पाटील यांना आमदारकीसह कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा प्राप्त झाल्याने त्यांची ताकद दुपटीने वाढली आहे. तसेच पक्षप्रमुखांचा विश्वासही पाटील यांनी संपादन केल्याने आगामी काळात ते पुन्हा हिंगोली लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत करतील असा अंदाज राजकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे.