Caste verification office in the hands of brokers
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात विद्यार्थ्यांसह शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जात पडताळणीसाठी अडवणूक केली जात असून जात पडताळणी कार्यालय दलालांच्या विळख्यात सापडले आहे. विशेष म्हणजे कोणता प्रस्ताव कोणत्या कर्मचाऱ्याकडे घ्यायचा यावरून कर्मचाऱ्यांमध्येच वाद होऊ लागल्याने कार्यालयात कामासाठी येणारे विद्यार्थी संभ्रमात सापडत आहेत.
येथील जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाकडे मागील काही दिवसात शेकडो प्रस्ताव धूळखात पडले आहेत. विद्यार्थी व शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी जात पडताळणीसाठी दाखल केलेले प्रस्ताव अडवून ठेवण्याचा प्रकार केला जात आहे. त्यानंतर संबंधित व्यक्ती कार्यालयात आल्यानंतर त्यांना प्रस्तावातील त्रुटी दाखवून जात पडताळणी कशी होत नाही हे सांगितली जात आहे.
मात्र आर्थिक देवाण-घेवाण झाल्यानंतर प्रस्तावातील त्रुटी सोयीस्करपणे बाजूला ठेवल्या जात असल्याचे चित्र आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू असून त्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. मात्र हे प्रमाणपत्र देताना विद्यार्थ्यांचीही अडवणूक केली जात आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाऊ किंवा बहिणीचे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्यानंतरही प्रस्तावामध्ये हेतू पुरस्सर त्रुटी काढले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांमधून केला जात आहे. तर शासकीय कार्यालयात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावामध्ये ही विनाकारण आडवणूक होत असल्याचा प्रकार कार्यालयामध्ये दिसून येत आहे.
शासनाने एखाद्या कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी झाल्यानंतर इतर कागदपत्र मागितली जाऊ नये असे स्पष्ट केल्यानंतरही हिंगोली च्या कार्यालयात अडवणुकीचे प्रकार कायम होत आहेत. जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे बहुतांश सदस्य बाहेरगावाहून ये जा करतात. त्यामुळे कार्यालयामध्ये कोणाचा पायपोस कोणाला
राहिलेला नाही. कर्मचारी ही एकमेकांमध्ये वाद करत असल्याचे चित्र कार्यालयात पहावयास मिळत आहे. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर समितीच्या अध्यक्षांकडे प्रस्ताव स्वाक्षरीसाठी पाठवले आहेत अशी उत्तरे देऊन परत पाठवले जात आहेत.
वरिष्ठ अधिाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
जात पडताळणीसाठी सादर केलेल्या प्रस्तावामध्ये काय आहे, हे पाहण्यापेक्षा कुठे त्रुटी काढता येईल यातच कर्मचारी देखील धन्यता मानत असल्याचे चित्र दिसू लागली आहे. यामुळे विद्यार्थी देखील वैतागून गेले आहेत. याकडे कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी वेळेत मिळावी यासाठी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे विद्यार्थ्यांमधून बोलले जात आहे.