औंढा नागनाथ : औंढा नागनाथ - जिंतूर मार्गे ये-जा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची बससेवा रस्त्याचे काम चालू असल्यामुळे गेल्या चार महिन्यापासून बंद आहे. सध्या रस्ता वाहतूक योग्य झाला आहे. तरीही गाड्या चालू झाल्या नसल्यामुळे प्रवाशांना परभणी किंवा हिंगोली मार्गे जिंतूर गाठावे लागते . राज्य परिवहन महामंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. प्रवाशांचे फार हाल होत आहेत. रस्ता वाहतुकी योग्य असल्यामुळे विभाग नियंत्रकांनी त्वरित बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी जनसामान्याची मागणी आहे.
औंढा नागनाथ बस स्थानकातून जिंतूर कडे स्थानिक फेऱ्यासह छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे, शिर्डी आदी लांब पल्ल्याच्या दररोज २१ बसेस आणि जिंतूर कडून औंढा मार्गे येणाऱ्या २१ बस फेऱ्या रस्त्याचे काम चालू असल्याने मागील चार महिन्यापासून पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्याचे नूतनीकरणाचे काम चालू असल्यास संबंधित कंत्राटदाराने वाहनांच्या रहदारीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे, परंतु प्रशासनासह राजकीय अनास्थेमुळे याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. हिंगोली वरून छत्रपती संभाजीनगर व त्यापुढे जाणाऱ्या सर्वच बस सेनगाव मार्गे वळविण्यात आले असल्याने औंढा बस स्थानकातून जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जिंतूर - औंढा दरम्यानची बस सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने औंढा - जिंतूर दरम्यान बस सेवा बंद असल्याचे महामंडळाचे अधिकारी सांगत आहेत. परंतु जिंतूर आगाराची बस सेवा आडगाव पर्यंत तर औंढा येथून देखील आडगाव पर्यंत स्थानिक बस सेवा चालू आहेत, तर नेमका रस्ता कुठं बंद आहे ते कळायला मार्ग नाही. जिंतूर व औंढा दोन्ही बाजूने आडगाव पर्यंत बसेस चालू असतील तर औंढा जिंतूर मार्ग बंद का ? असा प्रश्न प्रवाशी वर्गातून उपस्थित केला जात आहे.