गोरेगाव: पुढारी वृत्तसेवा : कन्हेरगाव नाका – गोरेगाव रस्त्यावर दुचाकी अपघातात सैन्य दलातील जवान पांडुरंग उत्तम रणबावळे (वय ३६) जखमी झाले होते. ही घटना गुरूवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास घडली होती. दरम्यान, जखमी रणबावळे यांना पुढील उपचारासाठी वाशिमवरून अकोला येथे हलविण्यात येत असताना वाटेतच रणबावळे यांचा मृत्यू झाला. गोरेगाव परिसरात शोककळा पसरली. (Hingoli News)
गुरुवारी सायंकाळी पाच वाजता गोरेगाव येथे भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली. अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहेच्या जय घोषात रणबावळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पांडुरंग रणबावळे यांनी २००५-०६ दरम्यान आर्मीमध्ये भरती झाल्यानंतर पंजाब , जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, लखनऊ, आदी ठिकाणी देशसेवा बजावली. नुकतीच त्यांची राजस्थानमध्ये नवीन पोस्टिंग झाली होती. मागील आठवड्यात गोरेगाव येथे ते सुट्टीवर आले होते. राजस्थान येथे सहकुटुंब घेवून जाण्याचे त्यांचे नियोजन सुरू होते. (Hingoli News)
दरम्यान, गुरूवारी (दि.२७) घरगुती सामान रेल्वेने राजस्थानला पाठविण्याकरीता अकोला येथे गेले होते. तेथून गोरेगाव येथे परतण्यासाठी सायंकाळच्या सुमारास ते कनेरगाव नाका येथे आले. त्यांनी सवना येथील शिवाजी रामभाऊ साळवे यांना सवनापर्यंत दुचाकीवर लिफ्ट मागितली. वायचाळ पिंपरी ते सवना दरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली.
सावळे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर वाशिम येथे उपचार सुरू आहेत. तर रणबावळे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हालविण्यात आले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रणबावळे यांच्या पश्चात आई -वडील, दोन भाऊ, भावजया, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा