Vashi Taluka Rain 
धाराशिव

Vashi Taluka Rain Update | वाशी तालुक्यावर वरुणराजा पुन्हा कोपला! 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार

Vashi Taluka Rain Update | गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता.

पुढारी वृत्तसेवा

Vashi Taluka Rain Update

गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, शनिवारी (दि. ४) मध्यरात्री वाशी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाला. रात्रभर कोसळलेल्या या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना महापुराचा फटका बसला आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे संसारोपयोगी नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून सुरू झालेल्या या पावसाने रविवार सकाळपर्यंत धुमाकूळ घातला. या पावसामुळे वाशी तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

पावसाचा गावांवर मोठा परिणाम

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना अचानक मोठा पूर आला. याचा थेट परिणाम अनेक गावांच्या दळणवळणावर आणि मालमत्तेवर झाला:

संपर्क तुटला: तेरखेडा ते कडकनाथवाडी आणि घोडकी ते वाशी या प्रमुख मार्गावरील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

घरात पाणी: कडकनाथवाडी गावातील जवळपास पाच ते सहा नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. यामुळे घरातील पीठ, धान्य, कपडे आणि इतर संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले.

जनजीवन विस्कळीत: घोडकी येथील देशमुख वस्ती आणि दसमेगाव येथील साठेनगर मधील नागरिकांच्या घरातही पाणी घुसले. यामुळे शेटीबा खंडागळे यांच्यासह अनेक कुटुंबांना रात्रभर जागून काढावी लागली.

शेतकरी संकटात, दुहेरी नुकसान

पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंदाने सोयाबीन काढणीचे काम सुरू केले होते. मात्र, याच वेळी आलेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे

काढलेले सोयाबीन भिजले: अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले सोयाबीन रात्रभर झालेल्या पावसात पूर्णपणे भिजून गेले. यामुळे सोयाबीनची प्रत (Quality) खराब होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

उभ्या पिकांचे नुकसान: दसमेगाव येथील नदीपात्राजवळील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, ऊस आणि मका ही उभी पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली किंवा पूर्णपणे जलमय झाली.

जनावरांचे मृत्यू: मांडवा या गावातील शेतकरी धंनाजी माळी यांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने गाईच्या दोन वासरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने नुकसान अधिक वाढले आहे. शेतीचे झालेले हे मोठे नुकसान पाहता, शेतकऱ्यांना तातडीने पंचनामा करून सरकारी मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT