Uddhav Thackeray Visit Bhoom
भूम : अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज (दि.५) भूम तालुक्यातील पाथरूड येथे येऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, जमिनी खरडून वाहून गेल्या, जनावरे दगावली, घरांचे नुकसान झाले, मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना अद्याप योग्य भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “हे सरकार चोर आहे. कारण सतत शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम या सरकारने केले आहे. प्रशासनाने पंचनामे करून अहवाल पाठवले, सरकारने मोठे पॅकेज जाहीर केले, पण शेतकऱ्यांच्या हातात साधी तुटपुंजी मदतही आली नाही. उलट या पॅकेजला खेकड्याने भाव पाडल्यासारखी अवस्था झाली आहे.
ते पुढे म्हणाले, अन्नदात्याला तुम्ही किडलेले, सडलेले धान्य खायला देता, याची सरकारला लाज वाटत नाही का? जो शेतकरी महाराष्ट्राला अन्न पुरवतो, त्यालाच माती खायला दिल्यासारखे अन्न देणे ही शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा आहे. शेतकऱ्यांना विमा मिळाला तो फक्त एक, दोन, तीन किंवा पन्नास रुपयांचा! हा पिकविमा की थट्टा?”
ठाकरे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना सुचित केले की, “ज्या शेतकऱ्यांना खात्यावर अशा प्रकारे तुटपुंजा विमा मिळाला आहे, त्यांची बँक स्टेटमेंट्स जमा करा. आपण सर्व शिवसैनिक आणि शेतकरी मिळून विमा कंपन्यांविरुद्ध मोर्चा काढू.
भूम तालुक्यातील उळूप गावात ठाकरे यांनी शेतीच्या बांधावर जात, बळीराजासोबत संवाद साधला. जितक्या वेदना ह्या शेतकरी मायबापाला होताहेत, तितक्याच वेदना ह्या मुक्या जनवरांनादेखील होताहेत. ही वेदना कायमची मिटवण्यासाठी शिवसेना एकजुटीने शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी लढत आहे.
यावेळी त्यांनी सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर “शिवभोजन” योजना बंद केल्याबद्दलही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार, जेव्हा सरकारने आनंदाचं शिधा बंद केलं आहे?, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, विहीर बुजलेल्या शेतकऱ्यांना ३० हजार आणि जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना ३ लाख ५० हजार मदतीचे आश्वासन दिले. पण साधे तीन रुपयेही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला उद्धव ठाकरे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आले आहेत, असा आरोप करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की त्यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना कोणत्याही निवडणुकीशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती.
या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मिलिंद नार्वेकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे, तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू महाराज, शहरप्रमुख प्रकाश आकरे, उपतालुका प्रमुख अब्दुल सय्यद, गणेश दुरंदे, प्रल्हाद अडागळे, महिला जिल्हा प्रमुख जिनत सय्यद, तालुकाप्रमुख उमाताई रणदिवे, कोहिनूर सय्यद यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.