अणदूर : पावसाअभावी सोयाबीन पिकाचे नुकसान मोठे झाले असूनही पंचनामे न झाल्याने संतप्त झालेल्या तुळजापूर तालुक्यातील किलज येथील युवा शेतकऱ्याने हगलूर शिवारातील आपल्या शेतातील सोयाबीन पेटवून दिले.
किलज येथील रहिवासी असलेल्या अजित पवार यांची हगलूर शिवारात शेती आहे. पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप पिकाचे पंचनामे झाले नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
पावसाअभावी सोयाबीनचे पीक हातचे गेले असून, उरलेले पीक काढण्यासाठीही पैसे नसल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे आपल्या तीन एकर दोन गुंठे क्षेत्रातील सोयाबीन पेटवून देत असल्याचे त्यांनी सांगितले.
पिकाचे नुकसान होऊनही शासनाकडून अद्याप मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आता तरी शासनाला जाग येऊन दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.