तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरातील सुमारे ५० कुटुंबांना तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत भूसंपादनासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, जागेचा मोबदला अद्याप निश्चित न झाल्याने जागामालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या प्राचीन आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या जागांसाठी शासनाने विक्रमी मोबदला द्यावा, अशी एकमुखी मागणी जागामालकांनी केली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजाभवानी मंदिर परिसर व तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविण्यात येत आहे. या आराखड्यांतर्गत मंदिर परिसरातील रहिवासी व व्यावसायिक जागांची थेट खरेदी करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून, महसूल प्रशासनाने संबंधित जागामालकांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, नोटिसा मिळूनही जागेचा मोबदला किती मिळणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने जागामालकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
या संदर्भात अनेक बैठका झाल्या असल्या तरी जागेचे मूल्यांकन व मोबदल्याची रक्कम याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. महसूल अधिकारी व मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडूनही ठोस आश्वासन मिळत नसल्याने अनेक जागामालकांनी प्रशासनाकडे लेखी स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, काही जागामालकांनी जागा देण्यास विरोध दर्शविला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही या प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नसल्याचे सांगितले जात असल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे. जिल्हाधिकारी व तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाने जागामालकांना बाजारभावापेक्षा अधिक आणि न्याय्य मोबदला द्यावा, तसेच ज्यांची घरे व व्यवसाय विस्थापित होणार आहेत, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः मंदिर परिसरात पिढ्यानपिढ्या पुजारीकी, धार्मिक साहित्य विक्री व यात्रेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा स्वतंत्रपणे विचार करावा, अशीही मागणी जागामालकांनी केली आहे.
परंपरागत धार्मिक व व्यावसायिक वारसा जपणाऱ्या या जागांचे मूल्यांकन करताना केवळ बाजारभाव न पाहता त्यांचे ऐतिहासिक, धार्मिक व व्यावसायिक महत्त्व लक्षात घेऊन विक्रमी मोबदला देण्यात यावा, अशी अपेक्षा जागामालकांनी व्यक्त केली आहे.