तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्र महोत्सवात बुधवारी (दि. ९) रोजी सातव्या माळेच्या दिवशी श्री. तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली. नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर ही महापूजा मांडण्यात आली.
या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलापासून (मळ) दोन दैत्य उत्पन्न झाले. त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत. ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रह्मदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन देवीला जागविले व विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री. तुळजाभवानी मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष शैया देवीला विश्राम करण्यासाठी दिले. त्यामुळे ही शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज नियमित श्री. तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात उद्या १० ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि ११ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. मंगळवारी रात्री देवीची वाघ वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. मोठया संख्येने भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.