The Yedeswari Devi fair concludes following the distribution of Ghugri Prasad
येरमाळा, पुढारी वृत्तसेवा: येरमाळा येथील आई येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेची सांगता आज मंगळवारी घुगरी महाप्रसादाच्या वाटपाने झाली. गेले चार दिवस आई येडेश्वरी देवीची पालखी चैत्रपौर्णिमा यात्रेनिमित्त आमराई पालखी मंदिरात मुक्कामी होती. पाचव्या दिवशी घुगरीच्या महाप्रसाद वाटपाचे आयोजन असते यानंतर देवीच्या पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान झाले.
सलग पाच दिवस चालू असलेल्या या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चुना वेचण्याच्या कार्यक्रमासाठी चुन्याच्या रानात पालखी आल्यानंतर पंधरा लाखांहून अधिक संख्येने भाविक उपस्थित राहून भाविकांनी पालखी वर चुनखडी टाकली तेथून पालखी आमराई मंदिरात आल्यानंतर पालखी चार दिवस मुक्काम राहिली.
या काळात भाविक मोठ्या संख्येने पालखीच्या दर्शनासाठी गर्दी होती. आज यात्रेचा शेवट दिवस असल्याने भाविकांनी पालखी दर्शनासह घुगरी प्रसादासाठी गर्दी केली होती. शिवाय मनोरंजनासाठी आलेल्या व्यवसायिकांच्या स्टॉलमधील आवश्यक वस्तु, गृहउपयोगी सामानाची खरेदी करण्यात महिला भाविक गुंतल्याचे चित्र दिसत होते. यात्रा म्हंटलं की, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते यामध्ये रविवारी रात्री पंचक्रोशीच्या गावातील देवीच्या आराधी मंडळासाठी आराधी गाण्यांच्या स्पर्धा व सोमवारी रात्री शोभेच्या दारुची आतिषबाजी करून भाविकांचे व यात्रेत सहभागी झालेल्या लोकांचे मनोरंजन करण्यात आले.
आज शेवटच्या दिवशी गावातील घरोघरी जाऊन रब्बी हंगामातील नवीन ज्वारी, गहू, हरभरा जमा केलेल्या धान्यातून घुगरी महाप्रसाद तयार करुन घुगरीचे वाटप केले जाते. ४ वा. आमराई मंदिरात देवीच्या पालखीची आरती महापूजा करुन घुगरी प्रसादाचे पुजारी, मानकरी, ग्राम पंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते घूगरी प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली. या घुगरी प्रसादासाठी अनेक जिल्ह्यातून भाविक आले होते.
आज पालखीचे प्रस्थान डोंगरावरील मुख्य मंदिराकडे होत असताना पालखी गावातील मुख्य चौकाचौकातून गेली. पालखीच्या पाठवणीसाठी गावातील प्रत्येक घरासमोर महिलांनी सडा शिंपून रांगोळी काढल्या होत्या. फुलं अंथरुन, पालखीला पायघड्या घालण्यात आल्या होत्या पालखी घरासमोर आल्यानंतर पालखीच्या खांदेकऱ्यांच्या पायावर पाणी वाहून चुरमुरे, लाह्या, बतासे, रेवढ्याचा प्रसाद वाहून प्रसाद वाटला.
गेले पाच दिवस यात्रेत मोठया उत्साहाचे वातावरण होते. पालखीची पाठवणी म्हणजे नववधूच्या लग्नानंतरची पाठवणी असेच कांहीसे वातावरण पालखी पाठवणीचे होते. पालखी जाताना चित्र पाहुन कांही महिला भाविकांचे डोळे पाणावलेले दिसले त्यामुळे साश्रुनयनांनी देवीच्या पालखीस भाविकांनी जडअंतःकरणाने निरोप दिला. गावातून पालखी गावकुसाबाहेरील ढाशीवर आल्या नंतर ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेत सहकार्य करणाऱ्या सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांचे आभार म्हणून शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सन्मान करण्यात आहे. याशिवाय टँकर, पाणपोई, पाणी बाटली वाटप करणाऱ्या भक्तांचेही सन्मान करण्यात आले. यानंतर देवीची पालखी डोंगर-वरील मुख्य मंदिराकडे रवाना झाली.
देवीची पालखी आलेल्या दिवशी लाखो भाविकांनी वेचलेली चुनखडी चुन्याच्या रानातील राशीवर गोवऱ्याच्या भट्टीत भाजन्यात आली. या भाजलेल्या चुन्याच्या राशीतील चुना वेचून पंचक्रोशीतील भाविकांनी चून्याच्या राशीवर जमा केला. आज पालखी सोवत ह्या भाजलेल्या चुनखडीची मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करुन बैलगाडीने मंदिराकडे नेहन रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी मंदिराला पहाटे चुन्याने रंगावण्याची प्रथा आहे. पहाटेच भाविक मंदिरात चुन्याने मंदिर सारववात. ही प्रथापूर्वापार चालत आली असून यासाठी आज आलेले भाविक मुकामी मंदिरावर राहतात तर कांहीं भाविक पहाटे मंदिराला सारवण्यासाठी येतात. त्यामुळेच चुना वेचण्याची परंपरा रूढ झाली आहे.