भूम : तालुक्यात १३ जूनच्या मध्यरात्री आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला. सुसाट वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली, वीजवाहिन्या तुटल्या आणि वीज खांब कोसळल्याने ग्रामीण भागातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी नागरिकांना तब्बल १८ तास वीजेअभावी राहावे लागले.
वादळामुळे रस्त्यांवर झाडे कोसळून काही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. वीजपुरवठा बंद झाल्याने पिण्याचे पाणी, मोबाईल नेटवर्क आणि दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी रात्रभर दुरुस्तीच्या कामात गुंतले होते. तुटलेल्या तारा जोडणे, पडलेली झाडे हटविणे आणि वीजवाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात आली. सुमारे १८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
अंतरगाव परिसरात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले. द्राक्षबागा, गोठे, विहिरींवरील सौरऊर्जा प्रकल्प, सोलर पॅनल आणि विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. वालवड परिसरात केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून घरांवरील पत्रे उडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.जवळा, येणेगाव, वांगी, आष्टा, कानडी, बेलगाव, पिंपळगाव, ईडा, चिंचपूर ढगे, वाल्हा, गणेगाव, वालवड, पाटसांगवी आदी गावांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे.
महसूल प्रशासन, ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. मात्र शेती पिके, झाडे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. शेतकरी वर्गातून नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने नागरिकांना धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.