Statewide Campaign to Strengthen the Congress Organization
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाच्या संघटन बळकटीसाठी संघटन सूजन अभियान राबविण्यात येत असून या माध्यमातून कार्यकर्ते बूथ स्तरापर्यंत जाऊन सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. या समस्या संबंधित विभागांकडे मांडून त्यांचा पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेश सह प्रभारी तथा धाराशिवचे निरीक्षक राजेश तिवारी यांनी दिली.
शनिवारी (दि. ११) काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष ड. धीरज पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव हेमंत ओगले, प्रदेश महासचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, प्रदेश सचिव उदयसिंग पाटील, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, राजाभाऊ शेरखाने, डॉ. स्मिता शहापूरकर, खलील सय्यद, पांडुरंग कुंभार, विनोद बीर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तिवारी यांनी सांगितले की, काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रा'मुळे देशभरातील सर्वसामान्यांच्या समस्या जवळून समजून घेण्यास मदत झाली.
छत्तीसगड येथील पक्ष अधिवेशनात अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय समाजाला ५० टक्के नेतृत्व देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून महिलांनाही नेतृत्वाच्या संधी दिल्या जाणार आहेत.
युवक कार्यकर्त्यांना जबाबदारी देऊन पक्षाची पुनर्बाधणी करण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी जिल्हा, तालुका, गट व बूथ स्तरावर जन-तेची मते जाणून घेऊन त्याचा अहवाल १९ एप्रिलपर्यंत केंद्रीय समितीकडे सादर केला जाणार आहे. जनतेशी नाळ जोडून काम करणाऱ्या विद्यमान जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संघटन सृजन अभियानाची वैशिष्ट्ये
बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांचा थेट जनसंपर्क, वाडी, वस्ती, गाव व तांड्यांमध्ये भेटी, जनतेच्या समस्या जाणून घेऊन शासकीय विभागांकडे पाठपुरावा, जिल्हाध्यक्ष निवडीसाठी जनमताचा आधार, एससी, एसटी, ओबीसी व महिलांना नेतृत्वात ५०% प्रतिनिधित्व, युवकांना पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी, जनतेशी नाळ जोडणाऱ्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना प्राधान्य