धाराशिव : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम रेल्वे सुविधा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून केंद्राचा 1 हजार कोटींचा हिस्सा तातडीने मंजूर करावा, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. या मार्गामुळे तुळजाभवानी मंदिर हे तीर्थक्षेत्र रेल्वे नकाशावर येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
लातूर-पुणे इंटरसिटी गाडी तातडीने सुरू करावी, तसेच हरंगूळ-पुणे गाडी पुणे मुख्य स्थानकापर्यंत चालवावी, अशी मागणीही त्यांनी केली. सध्या ही गाडी हडपसरपर्यंतच मर्यादित असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय कळंब रोड स्थानकावर लातूर-मुंबई गाडीला व ढोकी स्थानकावर नांदेड-पनवेल गाडीला थांबा देण्याची मागणी करण्यात आली.
धाराशिव-छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजूर निधीबद्दल समाधान व्यक्त करत हे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे, अशीही भूमिका त्यांनी मांडली.पुणे-सिकंदराबाद जलद गती रेल्वे मार्ग धाराशिव-लातूरमार्गे नेण्याची मागणी करत त्यांनी मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यावर भर दिला. तसेच छत्रपती संभाजीनगर हे विभागीय व न्यायिक केंद्र असल्याने धाराशिव-छत्रपती संभाजीनगर थेट रेल्वे मार्ग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.