Shiv Sena's march demanding the declaration of a drought
परंडा, पुढारी वृत्तसेवा : धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी व जनतेला आर्थिक मदत द्यावी, तसेच चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी केली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच तहसीलदार, परंडा यांच्यामार्फत निवेदन दिले.
जिल्ह्यात अपुरा पाऊस, वीजटंचाई, कमी दाबाचा वीजपुरवठा, पिकांवरील संकट आणि सिंचनाच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे धाराशिवसह संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व दुष्काळी मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
पीकविमा योजनेतील त्रुटी दूर करून प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात भरपाई द्यावी. केवळ उपग्रहाच्या आधारे पीक उत्पादन निश्चित न करता प्रत्यक्ष पीक पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला गती देऊन मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवून द्यावे, परंडा शहरातील रस्ते व कचरा डेपोचा प्रश्न सोडवावा आणि धाराशिव येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद आहे.
राठवाड्यासाठी १६ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या सुमारे ४७हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधील निधीचा विनियोग, पूर्ण झालेली कामे व लाभार्थी याची पारदर्शक माहिती जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली. मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी युवा नेते विश्वजीत पाटील, जयकुमार जैन, रईस मुजावर, जनार्धन मेहेर, शिवाजी मेहेर, सुभाष शिंदे, रेवण ढोरे, अनिल शिंदे, इस्माईल कुरैशी, डॉ. अब्बास मुजावर, मजहर दहेलूज, सत्तार पठाण, सोमनाथ अलबते, शंकर जाधव, जावेद बागवान, किरण शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मागण्यांचा मुद्देसूद आढावा
दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू कराव्यात.
कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाला गती द्यावी.
परंडा शहरातील रस्ते व कचरा डेपोचा प्रश्न सोडवावा.
धाराशिव येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी.
४७ हजार कोटींच्या पॅकेज खर्चाची पारदर्शक माहिती जाहीर करावी.