परंडा : महाराष्ट्राची ओळख बनलेला वडा-पाव आज देशभर लोकप्रिय आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत वडा-पावची मोठी मागणी असली तरी अनेक ठिकाणी तो तयार करताना तेच तेच तेल वारंवार वापरले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे याकडे लक्ष देणार का? संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, खाद्यतेल वारंवार उच्च तापमानावर गरम केल्यास त्यामध्ये हानिकारक रसायने तयार होतात. असे तेल वापरून तयार केलेले वडा-पाव, भजी, समोसे, कचोरी व इतर तळलेले पदार्थ खाल्ल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.वारंवार वापरलेल्या तेलाचे आरोग्यावर होणारे परिणाम हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता. पचनाचे विकार, अॅसिडिटी आणि पोटाचे आजार. यकृतावर (लिव्हर) विपरीत परिणाम. दीर्घकाळ सेवन केल्यास कर्करोगाचा धोका वाढण्याबाबतही संशोधनातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
जेव्हापासून अन्न व औषध प्रशासनाचा पदभार तुकाराम मुंडे यांनी हती घेतला आहे तेव्हापासून धडक कारवाया सुरू केल्या आहेत. या त्यांच्या कामाबद्दल जनतेतून विविध समाज माध्यमातून समाधान व्यक्त होत आहे. परंतु फक्त गुटखा, भेसळ किंवा मुदतबाह्य वस्तूंवर कारवाई करून चालणार नाही; लोकांच्या रोजच्या आरोग्याशी संबंधित अशा प्रकारांवरही विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. प्रश्न असा आहे की, राज्यभर लोकप्रिय असलेल्या वडा-पावसारख्या पदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विशेष तपासणी मोहीम राबविणार का? आयुक्त तुकाराम मुंडे या गंभीर विषयावर अॅक्शन घेणार का?
कारवाई होणार का?
अन्न सुरक्षा नियमांनुसार निकृष्ट किंवा वारंवार वापरलेले तेल अन्न तयार करण्यासाठी वापरणे योग्य नाही. त्यामुळे जिल्हाभरातील हॉटेल, फास्ट फूड सेंटर, वडा-पाव गाड्या आणि इतर खाद्य विक्रेत्यांची तपासणी करून वापरल्या जाणाऱ्या तेलाचे नमुने तपासले जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.