अश्विनी मनोहर पौळ  pudhari photo
धाराशिव

Naldurg fort incident : उपली बुरुजावरून उडीप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सासरच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

नळदुर्ग : येथील ऐतिहासिक किल्ल्यातील उपली बुरुजावरून महिलेने आपल्या तीन मुलांसह उडी घेतल्याच्या धक्कादायक प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून अश्विनी मनोहर पौळ यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी पती, सासू, सासरे व आत्यासासू अशा चौघांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबुलगा (ता. निलंगा, जि. लातूर) येथील अश्विनी मनोहर पौळ यांनी दि. ३ सप्टेंबर रोजी आपल्या तीन मुलांसह नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील उपली बुरुजावरून उडी घेतली होती. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर जुळ्या मुली वीरा आणि क्रांती या गंभीर जखमी झाल्या होत्या.

उपचारादरम्यान क्रांती हिचाही मृत्यू झाला असून वीरा हिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या तीन झाली आहे. अश्विनी यांचे वडील तानाजी शिवाजी मोहिते यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, अश्विनी यांचे पती मनोहर अंकुश पौळ, सासरे अंकुश पंढरीनाथ पौळ, सासू कालिंदा अंकुश पौळ तसेच मनोहर यांची आत्या विमलबाई (सर्व रा. अंबुलगा) यांनी अश्विनी यांना वारंवार त्रास दिला.

लग्नाच्या वेळी माहेरच्यांकडून हुंडा मिळाला नसल्याचे सांगून, आता दोन जुळ्या मुली झाल्यामुळे माहेरहून सोन्याच्या पाटल्या व रिक्षा घेण्यासाठी पैसे आणावेत, अशी मागणी करण्यात येत होती. या कारणावरून अश्विनी यांना वारंवार मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या छळाला कंटाळूनच अश्विनी यांनी मुलांसह बुरुजावरून उडी घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या फिर्यादीवरून मनोहर अंकुश पौळ, अंकुश पंढरीनाथ पौळ, कालिंदा अंकुश पौळ आणि विमलबाई यांच्याविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड करीत आहेत.

हुंड्यासाठी छळाचा आरोप

माहेरहून सोन्याच्या पाटल्या आणि रिक्षा घेण्यासाठी पैसे आणावेत, अशी मागणी अश्विनी यांच्याकडे केली जात होती. लग्नाच्या वेळी हुंडा दिला नसल्याचा तसेच दोन जुळ्या मुली झाल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांना वारंवार मारहाण व मानसिक त्रास दिल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे. या छळाला कंटाळूनच अश्विनी यांनी मुलांसह आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT