Kesar Mango Orchards Hit by Weather Instability: Dr. Sanjay Patil
वाशी, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यातील केसर आंबा बागांना यंदा हवामानातील अस्थिरतेचा मोठा फटका बसला असून आंबा उत्पादनात सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी घट येण्याची शक्यता आहे, असे मत केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले.
कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ रोजी वाशी तालुक्यातील विजोरा येथील आंबा बागांची पाहणी करण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी राज ाराम बर्वे, उपकृषी अधिकारी जाधव, सहायक कृषी अधिकारी रणजीत काकडे, लक्ष्मण जाधव तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
डॉ. पाटील यांनी सांगितले की, यावर्षी आंब्याचा मोहर सुमारे एक महिना उशिराने आला. मोहर येण्याच्या काळात कडाक्याची थंडी पडल्याने झाडे मोहराने भरून गेली होती. मात्र, दीर्घकाळ टिकलेल्या थंडीमुळे फुलांचे फळात रूपांतर होण्यास अडथळा निर्माण झाला आणि फळधारणा कमी राहिली. तसेच थंडीमुळे मोहराच्या दांड्यांची वाढ जास्त होऊन नर फुलांचे प्रमाण वाढले. दरम्यान, काही प्रमाणात झालेली फळधारणा अवकाळी पाऊस, वादळी वारे व पावसामुळे मोठ्या प्रमाणात गळून पडली.
त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. आंबा पिकावर नैसर्गिक संकटांचा मोठा प्रभाव असल्याने फळबाग लागवडीपूर्वी वारा रोखण्यासाठी संरक्षक झाडांची लागवड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या शिल्लक असलेल्या फळांची गळ थांबविण्यासाठी युरिया (२%), एनएए (२० पीपीएम) आणि पोटॅशियम नायट्रेट (१%) यांची १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. तसेच पाण्याची उपलब्धता असल्यास सिंचन करावे आणि उन्हापासून संरक्षणासाठी कागदी पिशव्यांचा वापर करावा, असा सल्ला त्यांनी दिला.