Kalamb: 10 corporators of Congress, Thackeray Sena joined Bharatiya Janata Party
परमेश्वर पालकर
कळंब : नगरपालिका निवडणुकीत ज्या पक्षाच्या विचारधारेवर मतदारांनी विश्वास टाकला, त्याच पक्षाला अवघ्या आठ महिन्यांत रामराम ठोकत कळंब शहरातील दहा नगरसेवकांनी भाजपची वाट धरली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून निवडून आलेल्या नऊ नगरसेवकांसह काँग्रेसच्या एका नगरसेविकेने गुरुवारी सोलापूर येथे भाजपमध्ये प्रवेश केल्याने कळंबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पक्षांतरामुळे मतदारांनी दिलेला कौल नेमका कुणासाठी होता?, असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
डिसेंबरमध्ये झालेल्या कळंब नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सुनंदा शिवाजी कापसे लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून विजयी झाल्या. त्यांनी ठाकरे सेनेच्या रश्मी संजय मुंदडा यांचा २ हजार २५४ मतांनी पराभव केला होता. नगरसेवकांच्या निवडणुकीत ठाकरे सेनेचे नऊ, भाजपचे सहा, शिवसेनेचे चार आणि काँग्रेसचा एक नगरसेवक विजयी झाला होता. त्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी ठाकरे सेनेचे नेते संजय मुंदडा यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली होती.
मात्र, नगरपालिका निवडणुकीला वर्षही पूर्ण होत नसताना राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. संजय मुंदडा यांच्यासह ठाकरे सेनेच्या नऊ नगरसेवकांनी आणि काँग्रेसच्या एका नगरसेविकेने भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवा नेते मल्हार पाटील आणि भाजप नेते नितीन काळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
या सामूहिक पक्षांतरामुळे कळंब नगरपालिकेतील विरोधकांचे संख्याबळ जवळपास संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता 'नगरपालिकेत विरोधक कोण?' आणि 'विरोधाची भूमिका कोण बजावणार?' असा प्रश्न उपस्थित होत असून, 'जनताच आता विरोधी पक्ष' अशी चर्चा शहरात रंगली आहे.
संजय मुंदडा यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत हे आपले अंतिम पक्षांतर असल्याचे म्हटले आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, निवडणुकीत एका विचारधारेवर मते मागून विजयी झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत पक्ष बदलण्याच्या या निर्णयावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सध्याची कळंब नगरपालिका महायुतीच्याच ताब्यात आहे.
राज्यातही महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे केवळ सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यामुळेच विकास होणार होता, असा युक्तिवाद कितपत योग्य आहे, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत. पक्षांतरामुळे कोणता विकास साधला जाणार, याचे उत्तर आता या नगरसेवकांकडून यांनी केला भाजपमध्ये प्रवेश संजय मुंदडा, सागर मुंडे, इंदुबाई नंदू हौसलमल, सफुरा शकील काझी, जमील खुरेशी, ज्योती हारकर, रुक्सना बागवान, वनमाला शंकर वाघमारे, आशा सुधीर भवर आणि काँग्रेसच्या अर्चना प्रताप मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.