Jakekur Wadi Gram Panchayat tax collection
उमरगा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जकेकूरवाडी (ता उमरगा) येथील ग्रामस्थांनी सोमवारी (दि २२) एकाच दिवसांत ३ लाख २० हजार पाचशे रुपयांच्या रकमेसह ग्रामपंचायतीचा कर भरणा केला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे धाराशिव जिल्ह्यात एका दिवसात संपूर्ण कर भरणा करणारी एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.
तालुक्यातील २८० कुटुंब तर १ हजार ६६६ लोकसंख्या असलेल्या जकेकूर वाडीची आदर्श गाव म्हणून ओळख आहे. गावात सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. याच परंपरेला पुढे नेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला. या अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य तपासणी शिबिरे, जनजागृती कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ग्रामस्थांनी एका दिवसात १०० टक्के ग्रामपंचायत कर भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
त्यानुसार गावातील प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून स्थावर मालमत्ता व पाणीपट्टी ग्रामपंचायत कराचा भरणा एकाच दिवशी पूर्ण केला. परिणामी ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय बळकटी आली असून आगामी विकासकामांना गती मिळणार आहे. तर जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व कर भरणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. जकेकूरवाडी ग्रामस्थांनी दाखवून दिलेला हा आदर्श जिल्ह्यातील इतर गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
तालुक्यातील जकेकुरवाडी ग्रामपंचायतीला आतापर्यंत विभागीय स्तरापर्यत विविध ६ पुरस्कार मिळाले आहेत. यात अनुक्रमे सर्व प्रथम क्रमांक तालुका व जिल्हा स्तरीय आर आर आबा स्मार्ट व्हिलेज. तालुका, जिल्हा व विभाग स्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच रोटरी क्लब आदर्श ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्थितीत बळकटी आली आहे. विकास कामांना आणखी गती मिळणार आहे. ग्रामस्थांची एकजूट, पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे नियोजनबद्ध कार्य आणि लोक सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचे ध्येय निश्चित केले आहे.- अमर सुर्यवंशी, सरपंच, जकेकूरवाडी
गावात गेल्या अनेक वर्षापासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. याचे आम्हाला कौतुक आहे. सर्व शासकीय व इतर सुविधा वेळेवर उपलब्ध होतात. त्यामुळे सामाजिक जबाबदारी ओळखून सर्व ग्रामस्थांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा एकाच दिवशी पूर्ण भरणा केला. यामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्थिती बळकटीकरणाला मदत होणार आहे.शिवानंद चक्रे, ग्रामस्थ