In Umarga taluka, 253 candidates are in the fray for the elections
उमरगा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकीत २७० उमेदवारांनी ५४० नामनिर्देशन पत्राची खरेदी केली होती. दोन्ही मिळून १६३ जणांनी ३१६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दाखल अर्जाची छाननी प्रक्रिया गुरूवारी (दि २२) पार पडली. छाननीत जिपचे ९० जणांचे तर पंचायत समिती गणांसाठी १६३ जणांचे अर्ज वैध ठरले.
उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद ९ गट व पंचायत समिती १८ गण निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेरपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत २७० जणांनी ६३९ उमेदवारी अर्ज घेतले होते. यात जिप २७८ तर पंचायत समिती ३६१ अर्जाचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी दुपारी तीन वाजता संपली. जिल्हा परिषद गटांसाठी ९० जणांनी ११८ तर पंचायत समिती गणासाठी १६३ जणांनी १९८ दोन्ही मिळून २५३ जणांनी ३१६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
तहसील कार्यालयात गुरुवारी, (दि २२) निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद येरमे यांच्या उपस्थितीत दाखल अर्जाची छाननी प्रकीया पार पाडली, यावेळी लातूरच्या अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरिक्षक शिल्पा करमरकर, माजी खासदार प्रा रविंद्र गायकवाड, आमदार प्रवीण स्वामी आदिसह उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली. छाननी प्रक्रियेत जिल्हा परिषद गटाच्या ९ जागेसाठी ९० अर्ज तर पंचायत समितीच्या १८ गणासाठी १६३ वैध ठरले. छाननीत वैध ठरलेले नामनिर्देशन पत्र उमेदवारांना मंगळवारी (दि २७) जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी दिली. तुरोरी गटातील आक्षेप फेटाळले!
छाननी प्रक्रिये दरम्यान तुरोरी जिप गटातील भाजपा अधिकृत उमेदवार प्रियंका प्रकाश आष्टे यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार पुजा विकास जाधव यांनी आक्षेप नोंदवला होता. तर अपेक्षा आष्टे यांनी भाजपा कडून उमेदवारी नाकारण्यात आलेल्या अपक्ष अर्चना जाधव यांचे जात प्रमाणपत्र कर्नाटक राज्यातील असल्याचा आक्षेप घेतला होता, रात्री उशिरापर्यंत याबाबत खलबते सुरू होते. मात्र हे दोन्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळून लावला.