रत्नापूर: बाळासाहेब जाधवर
येरमाळा व तुळजापूर परिसरात महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत दोन महिला आणि दोन पुरुष अशा चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे तुळजापूर पोलीस ठाण्यातील १ आणि येरमाळा पोलीस ठाण्यातील ३ असे एकूण ४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अनिता सुनील शिंदे, हिराबाई रमेश शिंदे, चिरंजीव रमेश शिंदे, किरण शेषेराव शिंदे (सर्व रा. पिंपळगाव तांडा, ता. अंबड, जि. जालना) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.
दि. १ मे २०२६ रोजी तुळजापूर येथील मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरीला गेले होते. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारचे काही गुन्हे धाराशिव जिल्ह्यात यापूर्वीही घडले असल्याने, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी हे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, १५ मे रोजी वाशी येथील पारगाव टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला. यादरम्यान एका स्कॉर्पिओ वाहनासह दोन महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी तुळजापूर आणि येरमाळा परिसरात महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून २७ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ कार जप्त करण्यात आली आहे.
संबंधित आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी येरमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने केली.