Girls from Dharashiv Excel in 12th Grade Exams!
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली असून जिल्ह्याचा निकाल ८८.५९ टक्के इतका लागला आहे. लातूर विभागात धाराशिव जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. लातूर जिल्ह्याचा निकाल ८९.८२ टक्के आहे.
जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींनी ११ टक्के अधिक प्रमाणात यश मिळवित आपला जलवा दाखवला आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षा घेतल्या होत्या. शनिवारी (दि. २) दुपारी हा ऑनलाइन निकाल जाहीर झाला.
लातूर विभागात नांदेड तसेच धाराशिव जिल्ह्याचा समावेश होता. यंदा नेहमीप्रमाणे लातूर पहिल्या स्थानावर, तर धाराशिव दुसऱ्या स्थानावर आहे. नांदेडचा निकाल ७७.७० टक्के आहे. धाराशिव जिल्ह्यातून १५ हजार ९९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १५ हजार ७१५ जणांनी परीक्षा दिली. त्यातील ५३७ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, तर ३३८० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ८००९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर १९९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शहरातील आरपी महाविद्यालयाचा निकाल ९०.१५ टक्के, श्रीपतराव भोसले हायस्कूलचा निकाल ९४.१६ टक्के, छत्रपती शिवाजी हायस्कूलचा निकाल ९४.४७ टक्के, तर जिल्हा परिषद मुलींच्या शाळेचा ८६ टक्के व मुलांच्या शाळेचा ८२.२२ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यात परीक्षा दिलेल्या ८५७२ पैकी ७१९६ मुले उत्तीर्ण झाली, तर ७१४३ मुलींपैकी ६७२३ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८३.९४ टक्के असून मुलींचे हेच प्रमाण ९४.१७ टक्के आहे.
शाखानिहाय असा आहे निकाल
जिल्ह्यात विज्ञान शाखेत ८, ३६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८,०४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (९६.१८ टक्के). कला शाखेत ५, ३५३ पैकी ४,१८८ विद्यार्थी उत्तीर्ण (७८.२३ टक्के), वाणिज्य शाखेत १,३९५ पैकी १,१८८ विद्यार्थी उत्तीर्ण (८५.१६ टक्के), व्यावसायिक शिक्षण शाखेत ४८३ पैकी ४०० विद्यार्थी उत्तीर्ण (८२.८१ टक्के), तर तंत्र विज्ञान शाखेत १२१ पैकी १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ८५.१२ टक्के लागला आहे.