

The result of the Sambhajinagar division has dropped by 2%.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.६८ टक्के निकाल लागला. हा निकाल गतवर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी कमी आहे. विभागात नेहमीप्रमाणे मुलांच्या तुलनेत मुलींनी यंदाही बाजी मारली आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण तब्बल सहा टक्क्यांनी अधिक आहे.
राज्य मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या निकालाची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोर्डाचे सहसचिव रवींद्र वाणी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांचीही उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतून एकूण १ लाख ८२ हजार ६८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी विभागातून एकूण १ लाख ६२ हजार २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण विभागाचा निकाल ८८.६८ टक्के लागला आहे.
यात प्रावीण्यासह (७५ टक्केपुढे) प्रथम श्रेणीत १९ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. तर प्रथम श्रेणीत (६० टक्के पुढील) ५३ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तर द्वितीय श्रेणीत (४५ टक्के पुढे) ६६ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
उत्तीर्ण श्रेणीत (३५ टक्के) २१ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. राज्याप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर विभागातही मुलींनीच बाजी मारली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.२४ टक्के एवढे आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.२ टक्के एवढे आहे.