उमरगा : धाराशिवच्या शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मधील गरीब विद्यार्थ्यांना शाळेला ये जा करण्यासाठी सायकल बँकेची स्थापन करण्यात आली आहे. सोमवारी (दि. २६) या बँकेत जमा झालेल्या १० सायकलीचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेच्या बोजड नियोजनाला, रोगट शिक्षण पद्धती व कारकुनी शिक्षण पद्धतीला कंटाळून ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या मुलांचा खाजगी शाळेत प्रवेश करू लागल्याने जि. प. च्या शाळा विद्यार्थ्यांच्या अभावी ओस पडण्याच्या मार्गावर असताना उमरगा शहराच्या विविध भागातील विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर हजर व शाळा सुटल्यावर घरी पोहोचण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
यावर उपाय म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी शाळेत सायकल बँकेची स्थापना केली. शहरातील सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती व नागरिकांना आपल्याकडे वापरात नसलेली जुनी किंवा नवीन सायकल शाळा बँकेला भेट देण्यासाठी आवाहन केले. याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी १० मोफत सायकली भेट दिल्या.
विद्यार्थ्यांना जमा झालेल्या सायकलीचे वाटप शालेय व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ज्ञ सदानंद शिवदे पाटील यांच्या हस्ते करण्यात आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल सगर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस धीरज बेळंबकर, केंद्रप्रमुख शिला मुदगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सायकली मिळाल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावरील आनंदाला पारावार उरला नव्हता. तर मुलींच्या पालकांनी सायकली मिळाल्यानंतर मुलींना वेळेवर शाळेत ये-जा करता येईल, आणि अधिकचा वेळ अभ्यासाला मिळेल आणि शिक्षण पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली. यावेळी सरिता उपासे, सोनाली मुसळे, ममता गायकवाड, शिल्पा चंदनशिवे, धनराज तेलंग, बशीर शेख, विद्यानंद सुत्रावे, सदानंद कुंभार, संजय रूपाजी, शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी शाळेत स्थापन केलेल्या सायकल बँकेला स्वतःसह धिरज बेळंबकर, अनिल सगर, राजेश चव्हाण यांनी प्रत्येकी दोन तर सोनाली मुसळे व पुष्पलता पांढरे यांनी प्रत्येकी एक अशा १० सायकली भेट दिल्या.
मी येथील इयत्ता आठवी वर्गात शिकत आहे. घर ते शाळा दररोज दोन किलोमीटर पायी चालत येत असल्याने सकाळच्या जादा तासिका व शाळेत वेळेवर यायला उशीर होत असे. सायकल मिळाल्यामुळे शाळेत वेळेवर यायला मदत होईल. आणि वेळेची बचत होणार आहे.- प्रिती तळभंडारे, विद्यार्थ्यांनी