Purified water testing pudhari photo
धाराशिव

Purified water testing : पाण्याच्या जारची तपासणी कधी? ‘एफडीए’कडून जनतेला अपेक्षा

पाण्याचे नमुने नियमितपणे तपासावेत, प्रयोगशाळा चाचण्या कराव्यात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरासह ग्रामीण भागातून होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : लग्नसमारंभ, हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, शासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये पिण्यासाठी पाण्याचे जार आणि बंद बाटल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही घराघरांत पाण्याचे जार पोहोचले असून, 'शुद्ध पाणी' या नावाखाली त्यांची विक्री होत आहे. मात्र हे पाणी प्रत्यक्षात किती सुरक्षित आणि शुद्ध आहे, याची नियमित प्रयोगशाळा तपासणी केली जाते का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पिण्याच्या पाण्याची शुद्धता केवळ ते स्वच्छ दिसते किंवा थंड आहे, यावर ठरत नाही. प्रयोगशाळेत जिवाणू, कोलीफॉर्म व ई. कोलाईसारखे सूक्ष्मजीव, पाण्याचा पीएच, टीडीएस, नायट्रेट, फ्लोराइड, जड धातू, गंध, रंग, चव आणि गढूळपणा आदी निकषांवर तपासणी झाल्यानंतरच ते पाणी सुरक्षित असल्याचे निश्चित करता येते.

तज्ज्ञांच्या मते, पाणी थंड करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शीतकरण यंत्रणांची सुरक्षितता, जारची स्वच्छता, भराव प्रक्रिया तसेच पाण्याची गुणवत्ता यांची नियमित तपासणी होणे अत्यावश्यक आहे. शीतकरण यंत्रणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औद्योगिक रसायनांचा पिण्याच्या पाण्याशी कोणताही संपर्क येत नाही, याची खात्री करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

अनेक ठिकाणी 'शुद्ध पाणी' असा दावा करून जारची विक्री केली जाते. मात्र संबंधित उत्पादक किंवा पुरवठादारांकडे पाण्याच्या गुणवत्ता चाचणीचे अद्ययावत अहवाल उपलब्ध आहेत का, पाणी भारतीय मानकांनुसार आहे का आणि त्याची नियमित तपासणी केली जाते का, याबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती दिली जात नाही.

यामुळे अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाभरातील पाण्याचे जार उत्पादक, पुरवठादार, हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स तसेच लग्नसमारंभांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुने नियमितपणे तपासावेत, प्रयोगशाळा चाचण्या कराव्यात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरासह ग्रामीण भागातून होत आहे.

पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याशी थेट संबंधित विषय असल्याने केवळ 'शुद्ध पाणी' असा फलक लावणे पुरेसे नाही. त्या शुद्धतेची वैज्ञानिक पडताळणी आणि सरकारी यंत्रणेकडून नियमित तपासणी होणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागात विक्री होणाऱ्या पाण्याच्या जार आणि बंद बाटल्यांच्या गुणवत्तेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT