Umerga Tehsil Office Fire Safety System Audit
शंकर बिराजदार
उमरगा : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांच्या दालनातील खुर्ची बाहेर काढून आवारात ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. सुदैवाने 'खुर्ची पेटली आणि संकट टळले', मात्र या घटनेने तहसील कार्यालयातील अग्निसुरक्षेची गंभीर अवस्था चव्हाट्यावर आणली आहे.
शहरातील विविध शासकीय कार्यालयात दररोज विविध कामांसाठी तसेच समस्या घेवून आलेल्या विद्यार्थी, वृद्ध, महिला, दिव्यांगासह नागरिकांची मोठी गर्दी असते. तहसील कार्यालयात बुधवारी सकाळी मराठा आंदोलकांनी तहसीलदाराची खुर्ची आवारात ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. त्यामूळे मोठं संकट टळले; पण हीच आग कार्यालयाच्या इमारतीत घडली असती तर? कागदपत्रे, संगणक, महत्त्वाच्या नोंदी, सीसीटीव्ही यंत्रणा आणि कार्यालयीन साहित्य तसेच बाजूला असलेला निवडणूक विभाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते.
त्याहून गंभीर म्हणजे उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता. सुदैवाने यात मोठी हानी झाली नसली तरी या घटनेने तहसीलच्या सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आग लागल्यानंतर अग्निशमन बंब येईपर्यंत प्राथमिक उपाययोजनांसाठी पुरेसे अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नाही.
संपूर्ण इमारतीसाठी बसविण्यात आलेला एकमेव अग्निरोधक सिलिंडर मुदतबाह्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी आग आटोक्यात आणायची कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या प्रशासनाच्या कार्यालयातच अग्निसुरक्षेची अशी दुरवस्था असेल तर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार ? आता तरी प्रशासन जागे होणार का? की मोठी दुर्घटना घडल्यानंतरच अग्निसुरक्षेची आठवण होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दैनिक ‘पुढारी’ मध्ये मागच्या वर्षात तहसील कार्यालयातील अग्निरोधक यंत्रणेच्या दुरवस्थेबाबत सर्व प्रथम वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. खुर्ची पेटली आणि संकट टळले; उद्या इमारतीला आग लागल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.