धाराशिव : यंदा पावसाची अधूनमधून येणारी सरही अप्रूप ठरत आहे. मागील आठ वर्षांच्या तुलनेत यंदा कमी पावसाचे संकेत मिळू लागल्याने रब्बी पिकांचे काय होणार, या कल्पनेनेच शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चार ऑगस्टअखेर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४५.९ टक्के पाऊस नोंदला आहे.
यंदा जिल्ह्यावर वरुणराजाची अवकृपा असल्याचे सातत्याने जाणवत आहे. मागील काही वर्षे जोरदार पावसाची अनुभूती घेतलेल्या तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्यांत आजपर्यंत चाळीस टक्के पाऊसही झालेला नाही. त्यामुळे नदी, नाले कोरडे असून पाणीसाठ्यातही वाढ झालेली नाही. केवळ खरीप पिके कशीबशी तग धरतील, असा पाऊस होत असल्याने भविष्यासमोरील संकट गडद दिसू लागले आहे.
यावेळी सर्वाधिक पाऊस भूम तालुक्यात झाला असून, सोमवारीही या तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर कळंब, परंडा व वाशी या तालुक्यांचा क्रमांक आहे. सर्वात कमी पाऊस लोहारा तालुक्यात आहे. एकंदर चित्र पाहिले तर जिल्ह्यातच पावसाचे प्रमाण अल्प असून, आतापासूनच यावर नियोजन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.परतीचा पाऊस नेहमीच जोरदार कोसळतो. यंदाही तशीच हजेरी लागली तर काही अंशी पाण्याचे संकट दूर होईल; अन्यथा प्रशासनाला आगामी काळात मोठी कसरत करावी लागू शकते, अशी स्थिती दिसू लागली आहे.
दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता मोजला गेलेला पाऊस असा : (कंसात वार्षिक सरासरीची टक्केवारी) धाराशिव ३०३.८ मिमी (४३.९ टक्के), तुळजापूर २२६.० मिमी (३४.६ टक्के), परंडा २५३.८ मिमी (५३.७ टक्के), भूम ३४३.४ मिमी (५९.१ टक्के), कळंब ३६४.४ मिमी (५७.८ टक्के), उमरगा २२३.६ मिमी (३९.५ टक्के), लोहारा १७१.६ मिमी (३१.५ टक्के) आणि वाशी ३३२.३ मिमी (५१.८ टक्के). जिल्ह्यात २७७ मिमी पाऊस नोंदला गेला असून, वार्षिक सरासरी ६०३.१ मिमी आहे.
खरिपाला तग धरण्यापुरता पाऊस; रब्बीची चिंता वाढली
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने सध्या खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी जमिनीत पुरेसा ओलावा साठलेला नसल्याने पुढील काळातील पावसावर पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. विशेषतः सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका यांसह अन्य खरीप पिकांना पावसाची आवश्यकता आहे. ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जमिनीत पुरेसा ओलावा आणि पाणीसाठा निर्माण झाला नाही, तर आगामी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा यांसह अन्य पिकांच्या पेरणीवरही परिणाम होऊ शकतो.